
निसर्ग निर्मित आपत्ती असो अथवा महामारीची आपत्ती असो, आपत्ती व्यवस्थापन आणि त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न यात भारत आता जगात अव्वल क्रमांकाचा देश म्हणून पुढे येत आहे. भारत देश हा जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे, त्याबरोबरच आता औषध निर्मितीच्या क्षेत्रात देखील जगात अव्वल क्रमांकाचा ठरला आहे. महासत्ता बनण्याच्या दृष्टीने भारताचे एक पाऊल पुढे पडले आहे.

कोविड-19 च्या महामारीच्या निमित्ताने जगभरात भारताचे आपत्ती व्यवस्थापन आणि लस निर्मितीच्या प्रयत्नांचे जगभरातून कौतुक होत आहे. कित्येक देशांनी भारता बरोबरचे आपले व्यापारविषयक संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. महासत्ता म्हणून जगावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा चीन देखील भारताबाबत नरमाईची भूमिका घेत आहे, त्याचे कारण देखील भारत हा विकसनशील देशांच्या यादीतून महासत्तेच्या रांगेत जावून बसला आहे हे आता जगाने मान्य केले आहे.

जगात एकशे नव्वदहून अधिक देश आहेत. यामध्ये फक्त पन्नास देश हे विकासाच्या वाटेवर आहेत. तर सात देश महासत्ता असल्याचा दावा करणारे देश आहेत. शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधन आणि उत्पादन क्षेत्रात विकास साधत या सात देशांनी महासत्ता असल्याचा दावा केला आहे. भारत देखील आता त्या रांगेत जाऊन बसला आहे. कोविड-19 ची लसीच्या उत्पादनात भारत या महासत्ता समजल्या जाणाऱ्या देशांच्या बरोबरीचा झाला आहे. जवळपास पस्तीस देशांनी कोविड लसीची मागणी भारताकडे नोंदविली आहे, यातच सर्वकाही आले आहे. सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे. महामारीशी लढा देतांना जगाचे नेतृत्व करण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळत आहे.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.