- दरवर्षी प्रमाणे ७ फेब्रुवारी पासून व्हॅलेन्टाईन वीक सुरू झालाय. पहिलाच ‘रोझ डे’ असल्याने दिवसभर फुल विक्रेत्याकडे गुलाबाचा भाव वधारलेला दिसला.
- रोमन परंपरेतील हा प्रेम व्यक्त करणारा उत्सव जेंव्हा ख्रिश्चन धर्मियांनी धार्मिकतेने स्वीकारला त्यानंतरच हा उत्सव जगभर पसरला.
- भारतात ब्रिटिश राजवटीचा पाया भक्कम होवू लागला त्याच काळात म्हणजेच १८०० सालाच्या प्रारंभीच्या दशकात धर्म प्रसारासाठी भारतात आलेल्या ख्रिश्चन मिशीनरीच्या माध्यमातून ‘व्हॅलेन्टाईन डे’ हा उत्सव भारतीयांना माहीत झाला.

याचा अर्थ प्रेम व्यक्त करणारा उत्सव किंवा ती प्रकटिकरणाची भावना वैदिक धर्मात अथवा हिंदू तसेच इतर धर्मात नव्हती का ? तर होती. पण ब्रिटिशांनी आणि ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी ‘संत व्हॅलेन्टाईन’ यांच्या आत्मबलिदानाचा उदोउदो करण्यामागे धर्मप्रसार एव्हढेच कारण असल्याने ब्रिटिशांची ज्या-ज्या देशात राजवट होती,त्या-त्या देशात धर्मप्रसारकांनी संत व्हॅलेन्टाईन यांच्या बलिदानाचा उत्सव म्हणून ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्याला धार्मिक अधिष्ठान देत त्याचे धार्मिक सणात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. यापाठीमागे केवळ मुक्त स्वातंत्र्याचा गवगवा करीत अधिक प्रमाणात धर्मांतर घडवून आणणे हाच हेतू असावा. याबरोबरच इतर धर्माच्या तुलनेत आपला धर्म किती समतावादी आणि मानवतावादी आहे हे ठसविण्याचा देखील प्रयत्न असावा.

पण खरी गंमत अशी आहे की, ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होत स्वातंत्र्य मिळविलेल्या लोकशाही पुरस्कृत भारत देशात व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्याचे अलीकडच्या काळात म्हणजेच वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पासून ‘पेव’ फुटले आहे. याला कारण जागतिकीकरणाच्या रेट्यात होणारे संस्कृती प्रदूषण हे असावे. पाश्चात्य जीवनपद्धती अंगिकारली की जगाच्या पाठीवर कुठेही आपण स्वीकारले जावू शकतो हा बुद्धिभ्रम असे परकीय संस्कृतीची भलावण करणारे उत्सव साजरे करायला भाग पाडतो.

गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून या प्रेमदिवसाच्या सादरीकरणाचा फोलपणा अधिक गडदपणे समोर येवू लागला आहे. आता एकविसाव्या शतकात माणूस धर्म आणि त्याचं पावित्र्य बाजूला ठेवून उत्सव साजरे करताना दिसत आहे. अश्या काळात सर्वच प्रकारच्या सार्वजनिक उत्सवावर सामाजिक सलोख्यासाठी नियंत्रण ठेवावे लागणार आहे. मग संत व्हॅलेंटाईनच्या नावावर होणारा प्रेमाचा उच्छाद तरी आपण सहन का करायचा ?
:- मुकुंद मधुकर हिंगणे.